चित्रा वाघ यांनी केली घटनास्थळाची पाहणी ; ‘महाविकास आघाडी सरकारवर ओढले ताशेरे ‘

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. २५ – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. आज भाजपच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर त्या वानवडी पोलिस स्टेशनला गेल्या आणि आरोपीविरोधात गुन्हा का दाखल केला नाही? असा जाब त्यांनी विचारला. पोलीस कुणाची चाकरी करत आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी तिन्ही पक्षांचे मंत्री हम साथ-साथ है असे म्हणत त्यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले आहे.चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकणावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी तिन्ही पक्षांचे मंत्री एकत्रित आले आहेत असा आरोप वाघ यांनी केला आहे. तसेच पूजा चव्हाण प्रकरणात एफआयआर दाखल करण्यासाठी कुणाच्या लेखी परवानगीची गरज आहे? असा सवालही त्यांनी केला.

पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास करायला हवा. मात्र सबळ पुरावे असतानाही पोलिस काहीच करत नाहीत. संजय राठोड यांना मंत्रालयातून काढून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली आहे. यासोबतच बाहेर आलेल्या ऑडिओ क्लिप्समध्ये सर्व स्पष्ट होत आहे. मग 17 दिवसांनंतरही पूजा प्रकरणात गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड हे पोहरादेवीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतरही त्यांनी कोरोना पसरवण्याचे काम केले. महंत कबीरदास यांच्यासह घरातील लोक आणि गावकरी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिमा जपावी, उद्धव ठाकरे संजय राठोड यांच्याविरुद्ध कारवाई करतील अशी अपेक्षा आहे असेही त्या म्हणाल्या. तसेच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावर तिचे वडील काहीच बोलत नाहीत. कारण त्यांच्यावर दबाव आहे असेही त्या म्हणाल्या.

चित्रा वाघ यांनी वानवडी पोलिस ठाण्यात जाऊन, आरोपी विरोधात गुन्हा का दाखल केला नाही असा जाब विचारला. यावर पोलिसांनी उत्तर दिले की, पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप कुणीही तक्रार दाखल केलेली नाही. यामुळे आम्ही गुन्हा दाखल करू शकत नसल्याचे वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले आहे. यामुळे चित्रा चव्हाण या संतप्त झाल्या आहेत. एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे आणि तक्रार आलेली नाही असे पोलिस म्हणतात. ते स्वत:हून दखल घेऊ शकत नाहीत का? कोणाच्या आदेशाची वाट बघत आहात? ह्यांना लाज वाटली पाहिजे. पोलिस हे महिलांचे रक्षक आहेत की भक्षक? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *