महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ – मुंबई – 1 मार्चपासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्ष आक्रमक भूमिका घेणार हे पक्षातील नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे. शेतकऱ्यांना बोंड अळीचा होणारा त्रास असेल, सोयाबीनचं नुकसान असेल या कोणत्याही विषयांमध्ये राज्य सरकारने मदत केली नाही, शेतमालाची खरेदी केली नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. त्यासोबतच राज्यात सर्वसामान्य आणि शेतकरी यांच्यासमोरही वीज बिलांचं मोठे संकट आहे. या सगळ्या विषयांवर राज्य सरकारकडे कोणतीही उत्तर नाही आणि म्हणूनच राज्य सरकार अधिवेशनापासून दूर पळत आहे असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपनं राठोड यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी आग्रही मागणी करत राज्यभर आंदोलनं केली होती. आता राठोड यांचा राजीनामा झाला असला तरी सरकार समोर कोणताही पर्याय नव्हता म्हणून हा राजीनामा झाला अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे. त्यासोबतच पूजा चव्हाण प्रकरणात तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत भाजप या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे, असं देखील फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे आणि ती कशी नीट करायची हे सरकारला कळत नसल्याने सरकार चर्चेपासून दूर पळत आहे, असा आरोप फडणवीस यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवणं हेच राज्य सरकारचं एकमेव धोरण असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांचे प्रश्न संपलेले नाहीत. या राज्यात महिला सुरक्षित नाहीत असा देखील आरोप फडणवीस यांनी केलेला आहे. त्यासोबतच सावरकरांविषयी कोणतंही बलिदान देण्याची तयारी बाळासाहेबांची असायची पण त्यांचे सुपुत्र मात्र त्यांना आदरांजली वाहत नाहीत, ही सत्तेची लाचारी आहे अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केलेली आहे.
या सोबतच कोव्हिडच्या दरम्यान मोठा आणि संतापजनक भ्रष्टाचार झाला असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली आहे. या वर्षी संत नामदेव महाराजांची 750 वी जयंती आहे. याचा उल्लेख गेल्या अधिवेशनावेळी देखील करण्यात आला होता. मात्र याबद्दल सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही, अशी टीका देखील फडणवीस यांनी केली आहे.