महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.८ मार्च – मुंबई -मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुढाकारामुळे आता रत्नागिरीच्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा (Nanar Refinery Project) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कालच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊन देऊ नका, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्य सरकारने गुंडाळलेल्या नाणार प्रकल्पाची फाईल पुन्हा उघडणार असल्याची चर्चा आहे. (Nanar Refinery Project in Ratnagiri)
या पार्श्वभूमीवर सोमवारी नाणारमधील काही प्रकल्पग्रस्त राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी ही बैठक पार पडेल. त्यासाठी नाणारचे प्रकल्पग्रस्त रविवारी रात्रीच बसने मुंबईला रवाना झाले. थोड्याचवेळात साधारण 11 वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण कृष्णकुंजवर पोहोचतील.
प्राथमिक माहितीनुसार, नाणार पंचक्रोशीतील जवळपास 100 प्रकल्पग्रस्त राज ठाकरे यांची भेट घेतील. यापैकी बहुतांश जण हे जमीन मालक आहेत. याशिवाय, नाणार रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीचे अध्यक्षही या बैठकीला उपस्थित राहतील. यावेळी राज ठाकरे यांच्यापुढे नाणारमधील तब्बल 8500 जमीन मालकांची संमतीपत्रेही सादर करण्यात येतील. त्यामुळे आता राज ठाकरे नाणारच्या मुद्द्यावरुन आक्रमक होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सरकारने नाणारबाबत सकारात्मक भूमिका घेतली तर मी आणि माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. एवढंच नव्हे तर पर्यावरण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने एक विकास आराखडा तयार करून आम्ही तो आपणांस सादर करू, असं सांगतानाच सद्यपरिस्थितीत महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी असे निर्णय घेणं ही काळाची गरज आहे. कोणी काहीही म्हणू दे .. महाराष्ट्र फर्स्ट .. असं धडाकेबाज धोरण असायला हवं, असंही त्यांनी म्हटलं आहे.