अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मुलींचे लग्नाचे वय बदलण्याचे संकेतही दिले आहेत. मुलींचे पोषण होण्याच्या दृष्टीने लग्नाचे वय बदलण्याचे संकेत निर्मला सितारामन यांनी दिले.
महाराष्ट्र २४, नवी दिल्ली: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज सादर केला जात आहे. यामध्ये केंद्र सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. यावेळी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मुलींचे लग्नाचे वय बदलण्याचे संकेतही दिले आहेत. मुलींचे पोषण होण्याच्या दृष्टीने लग्नाचे वय बदलण्याचे संकेत निर्मला सितारामन यांनी दिले. यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीकडून मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटलं की, आधी मुलींचे लग्न वयाच्या 15 व्या वर्षी व्हायचे. 1978 मध्ये शारदा कायदा लागू केल्यानंतर त्यात बदल झाला. आता मुलींचे लग्नाचे वय 18 वर्षे आहे. मुलींच्या शारीरिक पोषणाच्या दृष्टीने हा निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात सरकारने आता एक कृती दल स्थापन केलं आहे. त्यावर पुनर्विचार केला जाईल.
पोषणाशी संबंधित योजनांसाठी अर्थसंकल्पात 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं निर्मला सितारामन यांनी म्हटलं. मातांच्या आरोग्यासाठी तसेच लहान मुलांसाठीही पोषण अत्यंत महत्वाचे आहे. याची योग्य माहिती सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी अंगणवाडीसेविकांना स्मार्टफोन देण्यात आले आहेत. सध्या पोषण अभियानामध्ये सहा लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका काम करत असल्याची माहिती निर्मला सितारामन यांनी दिली.