महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि. ८ एप्रिल । मागील काही दिवसांपासून रिलायन्स कंपनी आपला जिओ प्लॅटफॉर्म मजबूत करण्याची योजना आखत आहे. यासाठी विविध प्रकारची गुंतवणूक करण्याबाबत व अन्य योजना आखण्यात कंपनी व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. याचाच एक भाग म्हणून रिलायन्स जिओने आता आंध्रप्रदेश, दिल्ली आणि मुंबई सर्कलमध्ये जवळपास 800 मेगाहर्ट्ज बँडमधील काही स्पेक्ट्रमची खरेदी करण्यासाठी भारती एअरटेलसोबत करार केला असल्याची माहिती आहे.
यासंबंधातला सदरचा व्यवहार हा जवळपास 1,497 कोटी रुपयांचा होणार असल्याची माहिती असून रिलायन्स जिओ 800 मेगाहर्ट्जमध्ये आंध्रप्रदेश, दिल्ली आणि मुंबईत अतिरिक्त स्पेक्ट्रमचा उपयोग करुन आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती आहे.
रिलायन्स जिओकडून दिलेल्या माहितीनुसार सदरचा हा व्यवहार जवळपास 1,497 कोटी रुपयांवर राहिला आहे. यासोबतच आंध्रप्रदेश, दिल्ली आणि मुंबई सर्कलमधील रिलायन्स जिओजवळ एकूण 7.5 मेगाहर्ट्ज अतिरिक्त स्पेक्ट्रम उपलब्ध होणार आहे. यामध्ये प्रत्येकी आकडा पाहिल्यास यामध्ये आंध्र प्रदेशात 3.75 , दिल्लीत 1.25 आणि मुंबईत 2.50 मेगाहर्ट्ज अतिरिक्त स्पेक्ट्रमचा वापर केला जाणार असल्याची माहिती आहे.
देशामध्ये जिओची ग्राहक संख्या ही 40 कोटींच्या जवळपास आहे. तसेच एअरटेल ग्राहकांची संख्या ही 37 कोटीच्या जवळपास आहे. देशात एकूण मोबाईल फोनच्या ग्राहकांची संख्या ही 96 कोटीच्या घरात पोहोचली आहे.