महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ९ एप्रिल । कोरोना संकट राज्यात पुन्हा एकदा निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारकडून अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसेच अभ्यासावर याचा परिणाम होत असून अनेकजण परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. यामध्ये एमपीएससीच्या उमेदवारांचाही समावेश आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांकडे सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो.
हॅशटॅगमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी एमपीएससी परीक्षेचाही उल्लेख आहे. याआधी जेव्हा राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली होती, तेव्हा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा उद्रेक पहायला मिळाला होता. त्यामुळे राज्य सरकारने लगेचच परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या होत्या. दरम्यान ११ एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा पार पडणार असल्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेते हे आगामी काळातच स्पष्ट होईल.