महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१५ एप्रिल । टाटा मोटर्सने (Tata Motors) पुण्यातील त्यांच्या फॅक्टरीतील उत्पादन 15 एप्रिल ते 30एप्रिल 2021 या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याचं एका पत्राद्वारे जाहीर केलं आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी मर्यादित कामगार संख्येने टाटा मोटर्सचे पुणे प्लांटमधील काम सुरू आहे. पण याठिकाणी उत्पादन बंद ठेवण्यात आलं आहे.
‘महाराष्ट्र सरकारने ब्रेक द चेन (Break The Chain) आदेशात नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून टाटा मोटर्स आपल्या पुणे प्लांटमध्ये कार्यरत आहेत. मर्यादित कर्मचारी सर्व सुरक्षा प्रोटोकॉल, अंतराचे निकष आणि स्वच्छता मानकांचे पालन करत याठिकाणी उपस्थित आहेत. संचारबंदी आदेशानुसार आम्ही आमच्या प्लांटमधलं वाहनांचं उत्पादन 15 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.’ असं टाटा मोटर्सने पुण्यातील (Pune) भोसरी (Bhosari) याठिकाणी असणाऱ्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये सादर केलेल्या पत्रात लिहिलं आहे.