महाराष्ट्र २४ मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असा लौकीक असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या 4 फेब्रुवारीला मांडला जाणार आहे .मात्र, या श्रीमंत महापालिकेच्या तिजोरीला लागलेल्या गळतीमुळे यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेला अंथरुण पाहूनच पाय पसरावे लागणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात दिड ते दोन हजार कोटींची घट होण्याची शक्यता आहे. तर, मुंबईतल्या अनेक विकास कामांनाही ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आर्थिक मंदी, कोट्यवधीचा थकलेला मालमत्ता कर, बांधकाम क्षेत्रातील घटलेल्या उत्पन्नामुळे पालिकेचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ठेवी मोडून तरतूदी करण्यात आल्या होत्या. यंदाही आर्थिक मंदीचे सावट असल्याने 2020-21 च्या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य वगळता बहुतांश विकास कामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
यंदाचा अर्थसंकल्प 30 हजार 692 कोटींवरून 27 हजार कोटींपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. 2019-20 चा मुंबई पालिकेचा अर्थसंकल्पीय अंदाजे 30 हजार 692 कोटी 59 लाख इतका होता. यंदाच्या डिसेंबरपर्यंत फक्त 12 हजार कोटी खर्च झाले आहेत, असे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे 2020-20 च्या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य वगळता बहुतांश कामांवरील खर्चाच्या तरतुदी कमी केल्या जाण्याची शक्यता आहे.