महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । लातूर । दि.४ मे । कोरोना प्रादुर्भावाच्या काळात कोविड-19 बाधित रुग्ण शासकीय तसेच खाजगी रुग्णालये आणि कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत आहेत. त्यामुळे या काळात अचानकपणे वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता महावितरण विभागाने घ्यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
मागच्या काही दिवसात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी मंत्रालयातून दुरदृष्य प्रणालीद्वारे लातूर जिल्हा प्रशासन, महावितरणचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली.
याप्रसंगी सूचना देताना पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले की, मागच्या काही दिवसात लातूर शहर आणि जिल्ह्यात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याच्या तक्रारी नागरीकांकडून येत आहेत. सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या कठीण काळातून आपण जात आहोत. कोविड-19 बाधित झालेले अनेक रुग्ण शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
शिवाय नारुस्त झालेले ट्रान्सफॉर्मर तात्काळ दुरुस्त करुन देण्याची व्यवस्था करावी. डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत वीज कनेक्शन देण्यात यावे, नवीन वस्त्यांमध्ये पोलची उभारणी करावी, वाकलेले पोल बदलून घ्यावे, शहर वस्त्यांमधून गेलेल्या हायटेंशनच्या वीजवाहिन्या इतरत्र हलवाव्या आदी सूचना पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी दिल्या आहेत.