महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.८ मे । पुणे । सध्या महाराष्ट्रात दिवसभर सर्वत्र उन्हाचा कडक ऊन आणि संध्याकाळी पावसाचे वातावरण असल्याचं दिसत आहे. राज्यातले हवामान 10 मे तारखेपर्यंत बदल होण्याची शक्यता नसल्याचं हवामान विभागाने कळवले आहे. काल संध्याकाळी मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरींनी हजेरी लावली.यंदा मॉन्सून सामान्य राहील असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. यामुळे थोडा शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी आजही असाच पाऊस अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी 6 ते 11 मे दरम्यान वादळी वारे आणि गारपिटीसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची आणि जनावरांची काळजी घ्यावी. दुपारी उन्हाचा कडाका वाढत आहे त्यामुळे संध्याकाळी पाऊस बरसत आहे. विदर्भ, मराठवाडा खान्देशात बहुतांश ठिकाणी पारा 40 अंशांच्या पुढेच आहे. काल राज्यातले सर्वाधिक 43 पुर्णांक 4 दशांश अंश सेल्सीअस तापमान अकोल्यात नोंदवले गेले.