महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ९ मे । अकरावी प्रवेशासाठी सीईटीच्या धर्तीवर ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. जुलैपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर ही परीक्षा घेण्याचा विचार शालेय शिक्षण विभाग करीत असून दहावीच्या विद्यार्थ्यांचे शाळास्तरावर अंतर्गत मूल्यमापन करता येईल का याची चाचपणीदेखील सुरू आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांकडून यासाठी अभिप्राय मागविण्यास सुरुवात झाली आहे.
शालेय शिक्षण आणि एससीईआरटीने अभिप्राय मागविण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. सर्वेक्षणासाठी वेबसाईट तयार करण्यात आली आहे. सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://www.research.net/r/11thCETTEST या वेबसाईटवर आपले मत नोंदवायचे आहे.
अकरावी प्रवेशासाठी एक स्वतंत्र सीईटीसारखी परीक्षा घ्यावी काय असा प्रश्न वेबसाईटवर विचारण्यात आला आहे.
ही परीक्षा राज्यातील सर्व शिक्षण मंडळाचे दहावीचे विद्यार्थी देऊ शकतील.
परीक्षेचे स्वरूप हे साधारणतः ओएमआर पद्धतीनुसार ठेवले जाणार आहे.
दहावीतील सर्व विषयांचा मिळून एकत्रित 2 तासांचा एक पेपर ठेवण्यात येईल.
परीक्षेत मिळणाऱया गुणांच्या आधारावरच अकरावीचे प्रवेश केले जातील.