महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ मे । सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा नाही. पण म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा मात्र तुटवडा आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या घटतेय ही समाधानकारक बाब आहे. परंतु ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अपेक्षेप्रमाणे कमी झालेली नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.
अजित पवार म्हणाले की, “सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा नाही. मात्र रेमडेसिवीरचा जास्त वापर नको, असा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे. परंतु म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा मात्र तुटवडा आहे, त्यामुळे आम्ही ही इंजेक्शन्स मिळवण्यासाठी संबंधित कंपन्यांना संपर्क केला. परंतु ठरल्याप्रमाणे तयार होणारी इंजेक्शन्स आधी केंद्र सरकारला द्यावी लागणार आहेत, असं कंपन्यांनी सांगितलं. त्यामुळे कोणत्या राज्याला किती इंजेक्शन द्यायची हे केंद्र सरकारच ठरवणार आहे.
लसीच्या पुरठवठ्यावरुन अजित पवार म्हणाले की, “देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झालं आहे. पण लसींचा पुरवठा जेवढा व्हायला हवा तेवढा होत नाही. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणं सुरु आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक लस निर्मितीचे प्रमाण वाढवत आहेत.”