महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २४ मे ।भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे आयपीएलचा उर्वरित मोसम अर्धवटच सोडावा लागला. यामुळे भारतात तच या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱया टी-20 वर्ल्ड कपवरही संकट ओढवले. भारतात सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनामुळे 2020 सालामध्ये ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात येणारा टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात आला. आता सलग दुसऱयांदा टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आता आयसीसीने 1 जूनला महत्त्वाची बैठक बोलावली असून यामध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी पर्यायी स्थळांचा विचार करण्यात येणार आहे.
1 जून रोजी होणाऱया बैठकीत आणखी काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. टी-20 व वन डे या क्रिकेटच्या दोन्ही प्रकारांतील वर्ल्ड कपमधील देशांची संख्या वाढवण्यावरही लक्ष दिले जाणार आहे. तसेच 2023 ते 2031 या कालावधीत कोणकोणत्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल यावरही चर्चा करण्यात येण्याची शक्यता आहे.
आताच्या घडीला टी-20 वर्ल्ड कप भारतात तच होणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीए; पण आगामी काळात भारतातील कोरोनाची परिस्थिती कशी असेल यावर टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन अवलंबून असणार आहे. आयपीएलचा उर्वरित मोसम यूएईला खेळवण्यासाठी बीसीसीआय पावले उचलत आहे. असे झाल्यास टी-20 वर्ल्ड कपही तिथेच खेळवण्यासाठी बीसीसीआय व आयसीसी प्रयत्न करील यात शंका नाही. यूएईसह इंग्लंड हाही एक पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यामुळे भारतात टी-20 वर्ल्ड कप पार पडला नाही तर इंग्लंड आणि यूएई या देशांपैकी एका ठिकाणी ही स्पर्धा होऊ शकते.