महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. ३१ मे । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी याबाबत मंगळवारी, १ जूनला केंद्र सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र, नववी, दहावी, अकरावी या तीन वर्षांच्या निकालाचा विचार करून संबंधित विद्यार्थ्याला बारावीचे गुण देण्यात यावेत, असा एक पर्याय सीबीएसई बोर्डाने मांडला आहे.
बारावीसाठी सर्वच विषयांऐवजी काही महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घ्यावी. तिचा कालावधी दीड तास असावा, असाही पर्याय सीबीएसईने मांडला होता. या पर्यायांना काही राज्यांनी नकार दिला, तर बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आधी कोरोना प्रतिबंधक लस दिली जावी व मगच त्यांची परीक्षा घेतली जावी, अशी मागणी काही राज्यांनी केली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांची बारावीच्या परीक्षांबाबत एक बैठक नुकतीच झाली. त्यात सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला होता.