महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जून । गेल्या सव्वा वर्षांत कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट, निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ अशी नैसर्गिक संकटे आली, मात्र त्यावर मात करीत राज्याच्या विकासाला खीळ बसू दिली नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केले.
डहाणूकरवाडी ते आरे स्थानकादरम्यान मेट्रो चाचणीचे उद्घाटन केल्यानंतर आकुर्ली स्थानकात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य शासनाची यंत्रणा किती गतीने काम करतेय याचे उदाहरण देताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात एका दिवसात 30 किमी लांबीचा डांबरी रस्ता तयार करण्याचे काम झाले असून त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
मुंबईत देखील रात्रीच्या बारा तासात सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम हाती घ्यावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले. मुंबई आणि महानगर परिसराला जोडणारे हे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण होत असून त्यामुळे मुंबईकरांना दिलासा देण्याचा आणि त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. दुर्गाडी पूल आणि राजनोली उड्डाणपुलाचे काम झाल्यामुळे मुंबई महानगर परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.