महाराष्ट्र २४ , पुणे – ढगाळ वातावरण आणि अंगाला बोचणाऱ्या वाऱ्यामुळे दिवसभर अंगातून हुडहुडी जात नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, फेबु्रवारी महिना निम्म्यावर आला तरी अद्याप थंडी जाणवत आहे. उत्तर, पूर्व विभागात पाऊस होत असल्याने त्याचा परिणाम दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
यंदा हवामानाचा लहरीपणा जरा जास्तच पहावयास मिळत आहे. रेकॉर्ड ब्रेक पावसानंतर थंडीही तेवढीच असेल असे वाटत होते. मात्र, नोव्हेंबरअखेर परतीच्या पावसाने पाठ सोडली नाही. त्यानंतर काही दिवस थंडी जाणवली; मात्र त्यामध्ये तीव्रता नव्हती.
जानेवारी महिन्यातही थोडे दिवस ढगाळ वातावरण तर काही दिवस थंडी असेच राहिले. फेबु्रवारी उजाडल्याने उष्णता वाढू लागेल, असे वाटत असतानाच गेली दोन दिवस अचानक बदल झाला. रविवारी पहाटेपासून थंड वारे वाहू लागले. दिवसभर वाऱ्यांची झुळूक राहत असल्याने अंगातून थंडी जात नाही. त्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी अधिकच जाणवू लागली.