महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. २१ जून – भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये शुक्रवारपासून साऊथम्प्टनमधील एजेस बोल या स्टेडियममध्ये जागतिक कसोटी क्रिकेट अर्थात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने दोन फिरकीपटूंना प्लेइंग इलेव्हनमध्य स्थान दिले आहे. वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थितीत दोन फिरकीपटूंसोबत खेळण्याच्या भारताच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताच्या माजी डावखुरा फिरकीपटू दिलीप दोशी यांनी मात्र दोन फिरकीपटू खेळवण्याच्या निर्णयाला सर्मथन दिलं आहे.
दिलीप दोशी यांच्या मते, चॅम्पियनशिपच्या या अंतिम सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांची भूमिका फार मोठी असणार आहे. दिलीप दोशी हे भारताचे असे खेळाडू आहे की, त्यांनी इतर भारतीयांपेक्षा इंग्लंडमध्ये जास्त क्रिकेट खेळले आहेत. दोशी यांनी सांगितले की, ‘भारताला प्रत्येक रनसाठी संघर्ष करावा लागणार आहे. या सामन्यात जडेजा आणि अश्विनची मोठी भूमिका असेल असे मला वाटते.’
दिलीप दोशी यांनी रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी केलेल्या फलंदाजीचं कौतुक केलं आहे. “या कठीण वातावरणातही रोहित शर्मा, कोहली आणि रहाणे यांनी चांगली कामगिरी केली तर शुभमन गिलनेही ठसा उमटविला”, असं दोशी म्हणाले.