34
महाराष्ट्र २४ – “राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही. येत्या डिसेंबर महिन्यात राज्यात मुदतपूर्व निवडणुका होतील” असा दावा करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेने ‘सामना’तून हल्लाबोल केला आहे. “दादा, तुम्ही खेळत रहा, वेळ चांगला जाईल आणि पाच वर्षे कधी पूर्ण झाली हे तुम्हाला कळणारही नाही,” असा मार्मिक सल्ला शिवसेनेनं चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी जे भाकीत केले आहे ते रस्त्यावरील पोपटवाल्याचे भविष्य असल्याची खिल्ली काही जणांनी उडवली. मात्र, हा गांभीर्याने घेण्याचा विषय असून पाटील अशी विधानं ठामपणे कोणाच्या इशाऱ्यावर करीत आहेत याचा विचार करायला हवा. पाटील यांनी उघडपणे दिलेली ही धमकी आहे. तीन वेगळ्या विचारांच्या पक्षांचे सरकार राज्यात एकत्र आले असले तरी त्यांच्यात कुरबुरी नाहीत. त्यामुळे भाजपाने कितीही तीर मारले तरी माशाचा डावा डोळा घायाळ होणार नाही. हे कळाल्यामुळेच त्यांना नैराश्य आलं आहे, अशा शब्दांत शिवसेनेने भाजपावर तोफ डागली आहे.
दिल्लीच्या मार्गदर्शनाशिवाय हे शक्य नाही.
दिल्लीच्या मार्गदर्शनाशिवाय पाटील असं करणार नाहीत. चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं आहे पण फडणवीस महाराष्ट्र सोडायला तयार नाहीत. आम्हाला विरोधी पक्षाची भुमिका करायची नाही, त्यासाठी काहीही करुन सत्ता काबीज करु असं वारंवार सांगणं मोदींच्या पक्षाला शोभत नाही. अटलबिहारी वाजपेयींचा भाजपा असा कधीच नव्हता, अशा शब्दांत शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे. डिसेंबरनंतर पाटील पुढची तारीख देतील आणि अशा प्रकारे तारखांवर तारखा पडत राहतील. यामध्ये पाच वर्षे कधी निघून गेली हे चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणीस यांना कळणारही नाही. त्यामुळे हा रंजक खेळ खेळत रहा, आपला चांगला वेळ जाईल, असं शिवसेनेने म्हटलं आहे.