महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । तिसऱया लाटेतही राज्यातले उद्योग सुरू राहतील असे नियोजन करायला हवे. हे उद्योग सुरू ठेवण्यासाठी जी तयारी करणे आवश्यक आहे ती करण्यासाठी मोठय़ा उद्योगपतींची बैठक घेऊन मार्गदर्शन करा. ज्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे तिथे त्यांनी त्याचे वेळीच नियोजन करावे व ज्या उद्योजकांना ते शक्य नाही त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात अशी जागा शोधून कामगारांची तिथे राहण्याची व्यवस्था करा, त्यादृष्टीने त्यांना जिल्हाधिकाऱयांनी आवश्यक असलेले सहकार्य करावे, अशा सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱयांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे चर्चा करून कोरोना स्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, उद्योग आणि आर्थिक चळवळ सुरू राहण्यासाठी कामगारांचे येणे जाणे हे त्यांच्या कामाचे ठिकाण आणि घर इथपर्यंतच मर्यादित राहणे गरजेचे आहे.
अजून कोरोनाची दुसरी लाट पूर्णत्वाने ओसरलेली नाही. परंतु याही स्थितीत कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन आपण हळुवारपणे काही आर्थिक उपक्रम सुरू करत आहोत. हे करताना सावधगिरीची पावले म्हणून जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत, ते कागदावर राहणार नाहीत, ते काटेकोरपणे अमलात येतील, कुठेही गर्दी होणार नाही, सभासमारंभ होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.