महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत त्या निर्बंधातून सूट मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु, सूट देण्याबाबत कोणताही निर्णय कालच्या च्या बैठकीत झाला नाही. यासंदर्भातील माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात रोजची रुग्णसंख्या सात ते नऊ हजार आहे. ९२ टक्के रुग्ण हे १० जिल्ह्यातील आहेत. तर २६ जिल्ह्यांमध्ये उर्विरीत ८ टक्के आहे. हॉटेलचे मालक, दुकानदारसुद्धा आम्हाला जास्त वेळ दुकान सुरु ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी करत आहेत. राज्यात सध्या निर्बंध आहेत. या निर्बंधांमध्ये कोणतीही सूट देण्याचा निर्णय झाला नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यावर आमचा भर असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. उर्वरित २६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नगरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे.
बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आधी महाराष्ट्रात येणाऱ्यांकडून आरटीपीसीआर चाचणीचं सर्टिफिकेट घेतलं जातं. मात्र, आता या पुढे ज्यांनी कोरोनाच्या दोन लस घेतल्या असतील आणि ज्यांच्याकडे तसे सर्टिफिकेट असेल त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.