महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक कमी होत असला तरी कोकणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे कोविडचे रुग्ण सापडत आहेत. तसेच राज्यातील कोविडचे निर्बंध हटविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी खास काळजी घ्यावी लागणार आहे. त्याबाबत एसटी महामंडळाने तयारी केली आहे. कोकणात प्रवास करताना प्रवाशांना मास्क बंधनकारक असणार आहे. तसेच प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतूक केल्या जाणार आहेत. प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. (Restrictions for st passengers)
गणपती उत्सवासाठी कोकणात 2200 बसेस सोडण्यात येणार आहेत. उद्यापासून आरक्षण करता येणार आहे. त्याआधी तर रेल्वेकडून 72 स्पेशल गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून 4 सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. 16 जुलै 2021 पासून आरक्षणाला सुरुवात होणार आहे. तर 14 सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत.
दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात येतात. कोरोनाचा काळ असल्याने यावर काही निर्बंध असणार आहेत. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. गणेशोत्सवासाठी 4 ते 10 सप्टेंबर 2021 दरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरु राहील. तर 14 ते 20 सप्टेंबरदरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील.