महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । महाराष्ट्रात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. संतत धार आणि कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह कोकणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड, चिपळूण, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, खेडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत स्वतः या संदर्भात माहिती दिली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण फोनवर चर्चा केली. महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत राज्य सरकारला सर्वतोपरी मदत केंद्राकडून दिली जाईल. सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान मोदींनी ट्वीटमधून सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. रत्नागिरी जिल्ह्यांत नद्यांना पूर आला आहे. संपूर्ण चिपळून शहत पुराच्या पाण्याने वेढले गेले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.