म्हाडावर जबाबदारी ; दुर्घटनाग्रस्त तळिये गावाची पुन्हा घरे बांधून देणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । कोकणामध्ये दरड कोसळून बाधित झालेले तळीये हे गाव पूर्ण वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे तळीये गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तळीये गाव उद्ध्वस्त झाले. गावातील ३२ घरे दरडीखाली गाडली गेली. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांचे अश्रू पुसताना त्यांच्या पुनर्वसनाचा शब्द दिला होता. त्यानंतर आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणालाही अडचण भासू देणार नाही असा जो शब्द दिला आहे त्यानुसार तो शब्द पूर्ण करण्याची ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवारसाहेबांनी केली होती’, असे ट्वीट करून आव्हाड यांनी म्हाडाने घेतलेल्या जबाबदारीची माहिती दिली. याबाबत अधिक माहिती देताना आव्हाड म्हणाले, गावाच्या पुनर्वसनाचे ठिकाण अजून ठरलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी तळीये गावकऱ्यांना सांगितले, शासन तुमच्या मागे उभे आहे. धोकादायक परिस्थितीत जी घरे आहेत, ती सुरक्षित ठिकाणी वसवणे आवश्यक आहे. ही सुरुवात आहे. आम्ही स्वत:हून हा निर्णय घेतला. शरद पवार यांच्यासोबतही चर्चा झाली, त्यावेळी त्यांनी म्हाडाने घरे बांधून द्यावी, अशी सूचना केली होती. त्यामुळे आम्ही घरे बांधून देणार आहोत. छान सुंदर, कोकणातले गाव उभे राहील, हे म्हाडा करेल, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *