पिंपरी चिंचवड ; तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू; ९६ कोटींच्या पुलावर वाहतूक नियोजनाचा अभाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । पिंपरी पालिकेने तब्बल ९६ कोटी रुपये खर्च करून बांधलेला निगडीतील भक्ती-शक्ती उड्डाणपूल मृत्यूचा सापळा बनला आहे. एका महिन्याच्या अंतरात उड्डाणपुलावर तीन अपघात झाले असून त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वाहतुकीचे व्यवस्थितपणे नियोजन करा अथवा पुलावरील वाहतूक बंद करा, असा सूर स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त होऊ लागला आहे.

हजारो वाहनांची वर्दळ असणारे चार विविध मार्ग जोडणारा हा उड्डाणपूल नुकताच सुरू करण्यात आला आहे. उद्घाटन कोणी करायचे, यावरून भाजप-राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगला होता. श्रेयवादात कामे पूर्ण झाली नसतानाच राष्ट्रवादीने आंदोलन केल्यानंतर हा उड्डाणपूल सुरू करण्यात आला.

त्यानंतर, पुणे-मुंबई महामार्गावरील वेगवान वाहतूक पुलावरून सुरू झाली. पुलावर गेल्या महिन्याभरात तीन वेगवेगळे अपघात झाले असून त्यात तिघांचा मृत्यू झाला. या तीनही मृत्यूस पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक सचिन चिखले यांनी केला आहे.

पूल सुरू होण्यापूर्वी दीड वर्षे रहिवासी भागातून वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था होती. तेव्हा एकही अपघात झाला नाही.

मात्र, ९६ कोटी खर्च करून बांधलेल्या या पुलावरून वाहतूक सुरू होताच तीन जणांचे बळी गेले आहेत. श्रेयासाठी चढाओढ करणाऱ्या राजकीय पक्षांचे वाहतूक नियोजनाकडे दुर्लक्ष आहे, याकडे चिखले यांनी लक्ष वेधले आहे.

तीन बळी गेल्यानंतर तरी पालिका प्रशासनाला जाग येईल का, याविषयी साशंकता आहे. निगडी उड्डाणपुलावर जाणाऱ्या आणि उतरण्याच्या मार्गावर तत्काळ दिशादर्शक फलक लावावेत. आवश्यकतेनुसार गतिरोधक बसवावेत. सुरक्षित वाहतुकीचे नियोजन करावे. अन्यथा, पुलावरील वाहतूक बंद करावी. नागरिकांच्या जीवाशी खेळू नये.

– सचिन चिखले, स्थानिक नगरसेवक, निगडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *