महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । भारत आणि इंग्लंड यांच्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांसाठी खास ठरला. पहिल्यांदा रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 126 धावांची धडाकेबाज खेळी केली. रोहित शर्माचं शतक मात्र हुकलं, तो 83 धावांवर आउट जाला. तर केएल राहुलनं कसोटी क्रिकेटमधील आपलं सहावं शतक पूर्ण केलं. दिवसाअखेर केएल राहुल 127 आणि अजिंक्य रहाणे 01 धावांवर नाबाद तंबूत परतले. इंग्लंडच्या वतीनं जेम्स एंडरसननं दोन आणि ओली रॉबिन्सननं एक विकेट घेतला. राहुलनं आपल्या डावात आतापर्यंत 12 चौकार आणि एक षट्कार लगावला आहे.
केएल राहुल (नाबाद 127) आणि रोहित शर्मा (83) च्या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये इंग्लंड विरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन विकेट गमावत 276 धावांची खेळी केली.
टॉसच्या वेळी पाऊस आल्यामुळे सामना जवळपास अर्धा तासानं सुरु करण्यात आला. इंग्लंडनं टॉस जिंकत गोलंदाजी करण्याता निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात चांगली राहिली आणि रोहित शर्मा, केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली.
दरम्यान, रोहित शर्माचं शतक मात्र हुकलं आणि तो 145 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि एक षट्काराच्या मदतीनं 83 धावा करत बाद झाला. फलंदाज म्हणून मैदानावर उतरलेल्या चेतेश्वर पुजारानं 23 चेंडूंवर एक चौकार लगावत नऊ धावा केल्या आणि बाद झाला.
त्यानंतर केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहलीनं 103 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला धावांचा डोंगर रचण्यास मदत केली. पण, कोहली 103 चेंडूंमध्ये तीन चौकार लगावत 42 धावा करुन माघारी परतला.