महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ऑगस्ट । मागच्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबईत तर काल रात्रीपासूनचं काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार मागच्या 24 तासांत मुंबईत 40-70 मिमीच्या आसपास पाऊस कोसळला आहे तर ठाणे आणि कल्याणमध्ये 80 मिमीपेक्षा सुद्धा जास्त पाऊस कोसळला आहे. आज दिवसभर मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार कायम राहणार आहे. पुढील 2 आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस असणार आहे. कोकणात जरी पावसाचा जोर कमी असला तरी राज्यभरत पडत असलेल्या या पावसाचा पिकांना फायदा होणार आहे.
मुंबईमध्ये काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सतत सुरु आहे. अद्याप पाणी साचल्याचं कुठेही समोर आलेलं नाही. अंधेरी, बांद्रा, दादर आणि दक्षिण मुंबईत सततधार पाऊस सुरु आहे. तर नवी मुंबई, पनवेल परिसरात देखील सततधार पाऊस सुरु आहे.
पुण्यात सकाळपासून हलका पाऊस सुरु आहे.
पालघर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. वसई विरारमध्ये रात्रभर पावसाची संततधार होती. सलग तिसऱ्या दिवशी ही वसई विरार शहरात पावसाची रिप रिप सुरु आहे. आज ढगाळ वातावरण आहे. अजून तरी शहरातील सखल भागात पाणी साचलेलं नाही.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण, पाऊस नाही.
नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू आहे.
नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू आहे
रायगड जिल्ह्यात अनेक भागात ढगाळ वातावरण, रात्रीच्या सुमारास काही भागात पावसाची हजेरी, सकाळपासून पाऊस नाही.
धुळे जिल्ह्यात काल दुपारपासून पावसाने विश्रांती घेतली असून ढगाळ वातावरण कायम आहे
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या 48 तासापासून संततधार सुरू असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे .