महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट ।केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर आता कोकणातील जनआशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली आहे. राणे यांना अटक झाली तरी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली जनआशीर्वाद यात्रा सुरू राहील असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर नव्या मंत्र्यांची बैठक घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना जनआशीर्वाद यात्रा काढण्याचे आदेश दिले.त्यानुसार सर्व राज्यांतील मंत्र्यांनी जनआशीर्वाद यात्रा काढली.राणे यांनी मुबंईतून जनआशीर्वाद यात्रा सुरू केली. पहिल्यापासून ही यात्रा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील टिकेमुळे चर्चेत होती.
राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना टार्गेट केले होते.मुंबई येथील यात्रेवेळी त्यांनी जोरदार टीका केली. त्यानंतर ही यात्रा कोकणात आली.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणाचा संदर्भ देत कानाखाली मारण्याचे वक्तव्य केले होते.
त्याचे पडसाद राज्यभर उमटले. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी राणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांना अटक करण्यात आली.तत्पुर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राणे यांची पाठराखण केली.त्यावेळी त्यांनी जनआशीर्वाद यात्रा काहीही करून सुरू राहील.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरू राहील असे जाहीर केले होते.प्रवीण दरेकर यांनीही तसे जाहीर केले. राणे यांना अटक होण्याचे संकेत मिळताच दरेकर मुंबईतून कोकणाकडे जायला निघाले होते.दरेकर यांनी माध्यमांना तशी माहितीही दिली होती. दरेकर यांनी जनआशीर्वाद यात्रेचे नेतृत्व करण्याचे नियोजन केले होते.मात्र, बुधवारी सकाळी जनआशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले. राणे यांच्या नेतृत्वाखालीच ही यात्रा निघेल यासाठी आग्रह आहे.