महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ सप्टेंबर । भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) गणेशोत्सवादरम्यान (Ganesh Festival) तब्बल 261 गणपती स्पेशल ट्रेन (Ganpati Special Trains) सोडण्यात येणार आहेत. गणेशोत्सवानिमित्त प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि गर्दी टाळता यावी, यासाठी रेल्वे विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. वेगवेगळ्या भागात आणि वेगवेगळ्या वेळी या ट्रेन धावणार असून त्यामुळे गणेश भक्तांची मोठी सोय होणार आहे.
261 स्पेशल ट्रेनपैकी 201 रेल्वे मध्य रेल्वेकडून, 42 ट्रेन पश्चिम रेल्वेकडून, 18 ट्रेन कोकण रेल्वे कॉर्पोरेशकडून चालवण्यात येणार आहेत. या ट्रेन धावायला सुरुवात झाली असून अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजेच 20 सप्टेंबरपर्यंत त्या धावणार आहेत. या सर्व ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी जागा आरक्षित करणं बंधनकारक असून खास सवलतीच्या दरात या रेल्वेने प्रवास करता येणार आहे.
सणासुदीच्या काळात नागरिकांना आपापल्या गावी जाण्यासाठी किंवा नातेवाईकांकडे जाण्यासाठी प्रवास करण्याची गरज असते. भारतात सध्या सर्वात जलद आणि सोयीचा प्रवास म्हणून रेल्वे प्रवासाकडे पाहिलं जातं. नागरिकांची या काळात सोय व्हावी आणि त्यांना माफक दरात आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी रेल्वेनं सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या ट्रेन धावायला गेल्या आठवड्यापासूनच सुरुवात झाली असून IRCTC च्या वेबसाईट किंवा मोबाईल ऍपवरून त्याचं बुकिंग सुरु करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातील ट्रेन या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), पनवेल, सावंतवाडी रोड आणि रत्नागिरी या मार्गावर धावणार असून मुंबई-रत्नागिरी मार्गावर एकूण 72 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे दरवर्षी सणासुदीच्या काळात होणारी गर्दी नियंत्रित करणे शक्य होणार असल्याचा विश्वास रेल्वेनं व्यक्त केला आहे. गणपती विशेष ट्रेनमध्ये एक एसी-2 टियर, एसी-3 टियर, चार एसी-3 टियर, 11 स्लीपर क्लास आणि 6 सेकंड क्लास कोच असणार आहेत.