महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ सप्टेंबर । माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेली सूचना मान्य करत पोलिसांना विशेष निर्देश दिले आहेत. यामध्ये इथून पुढे परप्रांतियांची नोंद ठेवण्याचे महत्त्वाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिस यंत्रणेला दिले आहेत. साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन पोलिसांना अतिशय महत्त्वाच्या सूचना दिल्या.
राज ठाकरेंची सूचना उद्धव ठाकरे यांच्याकडून मान्य
राज्यात कुठून परप्रांतीय येतात, कुठे जातात, कुठे राहतात, याची कसलीही नोंद नाही. ती नोंद राहिली पाहिजे, परप्रांतीयांच्या बाबतीची माहिती ही स्थानिक पोलीस स्टेशनकडे पर्यायाने राज्य सरकारकडे असली पाहिजे, असं वारंवार राज ठाकरे आपल्या जाहीर सभांमधून सांगत असतात. राज ठाकरेंची हीच सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केली आहे.
उद्धव ठाकरे यांचे पोलिसांना निर्देश
# गुन्ह्यात रिक्षांचा वापर झाल्याचे निरिक्षण नोंदवण्यात आले. त्यावर रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालण्यात यावा. त्याबाबत नोंदणी करतानाच, स्थानिक पोलिसांकडे माहिती देण्याचे संबंधित परवानाधारकाला बंधनकारक करावे.
# इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल.
जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो. पण शिक्षेच्या अमंलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न व्हावेत.
# निती आयोगाच्या उद्या (मंगळवारी) होणाऱ्या बैठकीत जलदगती न्यायालयांच्या कार्यप्रणालीत धोरणात्मक सुधारणा करण्याची सूचना करण्यात यावी.
# शक्ती कायद्यातही या अनुषंगाने सुधारणा करण्यावर भर दिला जाईल.
# महिला पोलीसांनी पीडीत महिलांशी संवाद साधून, विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. त्यांच्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष होऊ नये.
परप्रांतीयांची कुठलीही नोंद नसल्याने ते कुठूनही येतात, कुठेही राहतात, मर्जीप्रमाणे जगतात.. अनेक गुन्ह्यांत त्यांचा सहभाग असतो, हे अनेक वेळा समोर आलेलं आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी अनेक वेळा आपल्या जाहीर भाषणांमधून केला आहे. आता साकीनाक्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन राज ठाकरेंनी केलेली सूचना मान्य केली आहे.