महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ सप्टेंबर । तुम्हीही Smartphone खरेदीचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सणासुदीचा काळ असताना आता स्मार्टफोन कंपन्या सध्याच्या फोनच्या किमतीत 7 ते 10 टक्क्यांची वाढ करू शकतात. मागील सहा महिन्यांपासून चीनमधून भारतात कच्चा माल येण्यासाठी समस्या येत आहेत. भारत हळू-हळू मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून तयार होत आहे, परंतु पूर्णपणे आत्मनिर्भर होण्यासाठी अजून बराच काळ लागेल.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, Semiconductors ची मोठी मागणी आहे. कारण कोरोना, लॉकडाउन काळात ऑनलाईन शिक्षण आणि रिमोट वर्किंगचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे स्मार्टफोन, लॅपटॉपसारख्या इतर प्रोडक्ट्सची मागणी वाढली आहे. सेमीकंटक्टरच्या मागणीने जागतिक पुरवठा साखळीवर प्रचंड दबाव आला आहे. चीनमध्ये मालवाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे उपकरणं उत्पादकांवर, निर्मात्यांवर दबाव निर्माण झाला आहे. भारतात बहुतेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे घटक चीनमधून येतात.
काउंटपॉइंटर रिसर्चचे तरुण पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल फोन उद्योगावर पुरवठा साखळीच्या निर्बंधांचा प्रभाव आणखी दोन तिमाहीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात नव्या मॉडेल्सची कमतरता, नवे फोन लाँच होण्यासाठी विलंब, सध्याच्या उत्पादनांच्या किमतीमध्ये संभाव्य वाढ यासारख्या गोष्टींचा परिणाम होईल. तसंच खरेदीदारांसाठी कमी ऑफर असतील. आगामी सणांच्या काळात नव्या मॉडेल्सची मोठी मागणी राहण्याची शक्यता आहे.
Realme चे उपाध्यक्ष आणि भारत-युरोपचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिपसेटची कमतरता स्मार्टफोन निर्मात्यांसाठी आव्हानात्मक समस्या आहे. उत्पादन आणि वितरण सुविधा हळू-हळू खुल्या होत असून त्याचा विस्तार होत आहे. 2022 च्या तिमाहीनंतर चिपसेटची कमतरता दूर होऊ शकते, असा अंदाज आहे.