महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ सप्टेंबर । आधारला पॅनशी जोडण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी, आयकर विभागाने शुक्रवारी तीन मोठे निर्णय घेतले आहेत. सरकारने पॅन कार्ड बायोमेट्रिक आयडी आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. यासोबतच, सरकारने थेट कर निराकरण योजना ‘विवाद से विश्वास’ अंतर्गत पेमेंटची तारीखही वाढवली आहे आणि बेनामी मालमत्ता व्यवहार रोखण्याबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटामुळे या सर्व गोष्टींसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
पॅनकार्ड आधारशी जोडण्यासाठी पुढील वर्षापर्यंत मुदतवाढ
पॅनला आधारशी जोडण्यासाठी आयकर विभागाला आधार क्रमांक कळवण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021 ऐवजी 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आयकर खात्याने पॅन कार्डधारकांना त्यांचे पॅन आधार कार्डाशी वेळेत जोडण्यास सांगितले आहे, अन्यथा त्यांचे पॅन निष्क्रिय केले जाईल.
पॅनकार्ड रद्द झालं तर काय अडचणी येतील?
जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, पण ते आधारशी लिंक नसेल तर ते अवैध ठरवले जाईल आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक वैध म्हणून घोषित केली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैध पॅन कार्डशिवाय रिटर्न भरणंदेखील शक्य नाही.
पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?
– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगइन करा.
– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.
– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.
– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.
आधारकार्ड UAN नंबरशी लिंक करण्याची मुदत 1 डिसेंबरपर्यंत वाढवली
केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधीसाठी (EPFO) वापरल्या जाणारा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि आधार कार्ड (Aadhaar number) लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. त्यानुसार आता नोकरदारांना या दोन्ही गोष्टी लिंक करण्यासाठी 1 डिसेंबरपर्यंतचा अवधी मिळाला आहे. यापूर्वी EPFO ने नोकरदारांना या कामासाठी 1 सप्टेंबरपर्यंतचा अवधी देऊ केला होता. त्यानंतर UAN नंबर आणि आधार लिंक नसल्यास पीएफची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे तुर्तास नोकरदारांना दिलासा मिळाला आहे.