महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ सप्टेंबर । बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचे रूपांतर आता ‘गुलाब’ नावाच्या चक्रीवादळात झाले आहे. हे वादळ उद्या रविवारी अरबी समुद्रात धडकणार आहे. त्याच्या प्रभावामुळे 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान कोकणासह महाराष्ट्रात वादळी वाऱयासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
सध्या हवामानात मोठे बदल झाले असून कमी दाबाच्या पट्टय़ामुळे ‘गुलाब’ चक्रीवादळ तयार झाले आहे. हे वादळ रात्री उशिरापर्यंत ओडिशा-आंध्र प्रदेशच्या किनारी भागात पोहचणार आहे. त्यानंतर ते महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेला हा अंदाज खरा ठरला तर 26 सप्टेंबरपासून दक्षिण ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी परिसरात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी स्पष्ट केले आहे.