बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होणार?; राज्य सरकार प्रयत्नशील

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ सप्टेंबर । महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात यासाठी राज्य सरकारची सकारात्मक भूमिका आहे. या शर्यती सुरू होण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असून, त्यासाठी वटहुकूम काढण्याची तयारी सुरू आहे. कायदेशीर प्रक्रियेचा अभ्यास करून याप्रश्नी मार्ग काढण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी सांगितले.

राज्यात करोना साथरोगाचा प्रभाव कमी होत आहे. यामुळे ग्रामीण भागात लोकप्रिय व पारंपरिक खेळ असलेल्या बैलगाड्या शर्यतींना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आ. नितेश राणे यांनी केली आहे. करोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने दूर करण्यात येत आहेत. बैलगाडा शर्यती व बैलांची झुंज ग्रामीण भागांतील लोकप्रिय, पारंपारिक प्रकार आहेत. त्यामुळे तेही सुरू करण्याची परवानगी मिळावी. बैलांना कोणत्याही प्रकारची इजा वा दुखापत होणार नाही याची योग्य ती काळजी घेतली जाईल, तरी शर्यतीच्या कार्यक्रमांना नियम व अटींच्या अधीन राहून सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी आ. नितेश राणे यांनी केली आहे. बैलगाडा संघटना आणि शेतकऱ्यांचीही बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी सरकारवर दबाव आहे.

बैलगाडा शर्यत हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयात आपण राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ व निष्णात वकील देऊ. एका बाजूला हा प्रयत्न असून, दुसरीकडे कायद्यात काही सुधारणा करता येईल का याचा विचार सुरू आहे. वेळप्रसंगी राज्य सरकार वटहुकूम काढू शकते, असे संकेत गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *