अरविंद त्रिवेदी यांचं निधन ; ‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यानं घेतला जगाचा निरोप,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑक्टोबर । टीव्ही जगतात लोकप्रिय मालिका रामायण (Ramayan) मध्ये रावणा (Ravan)ची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) यांचं निधन (Passes Away) झालं आहे. अरविंद त्रिवेदी यांचे मंगळवारी रात्री मुंबईत निधन झालं. त्यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रामानंद सागर यांच्या रामायणात त्रिवेदी यांनी रावणाची भूमिका साकारली होती. ज्याला लोकांनी चांगलीच पसंती दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद त्रिवेदी यांच्यावर आज (बुधवार) सकाळी मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. ते बऱ्याच काळापासून आजारी होते, पण काल ​​रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला. अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची पुष्टी त्यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनीही केली आहे.

कौस्तुभ त्रिवेदी म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी आहेत. गेल्या 3 वर्षांपासून त्यांची तब्येत खूपच खालावली होती. या काळात त्यांना अनेक वेळा रुग्णालयात दाखल करावं लागलं. ते महिन्याभरापूर्वीच रुग्णालयातून घरी परतले होते. मात्र मंगळवारी रात्री 9.30 च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांनी कांदिवली येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला.

‘रामायण’मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांनी साकारलेल्या आणखी अनेक भूमिकांचंही खूप कौतुक झालं. त्यांनी टीव्ही मालिका ‘विक्रम और बैताळ’ मध्येही काम केलं. या मालिकेनंही छोट्या पडद्यावरही बराच काळ वर्चस्व ठेवलं होतं.

अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात झाला. गुजराती रंगभूमीपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचा भाऊ उपेंद्र त्रिवेदी हे देखील गुजराती चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे आणि त्यांनी गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अरविंद त्रिवेदी यांना गुजराती भाषेत धार्मिक आणि सामाजिक चित्रपटांद्वारे गुजराती प्रेक्षकांमध्ये प्रसिद्धी मिळाली, जिथे त्यांनी 40 वर्षे योगदान दिलं. त्यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठीअनेक पुरस्कारही मिळालेत.

त्रिवेदींनी 300 हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले. 2002 मध्ये, त्यांना सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) चे कार्यवाह अध्यक्षही बनवण्यात आले. याशिवाय, ते 1991 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर खासदार झाले आणि पाच वर्षे पदावर राहिले होते. 1991 ते 1996 पर्यंत त्यांनी खासदार पदही भूषवलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *