महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑक्टोबर । शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेशाच्या यंदा ३४ हजार ९२९ जागा रिक्त आहेत. राज्यात प्रवेशासाठी ९६ हजार ६८४ जागा उपलब्ध आहेत, त्यापैकी केवळ ६८ हजार ६५२ जागांवरच प्रवेश झाले आहेत.
आरटीईनुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना पहिली ते आठवीमध्ये मोफत शिक्षण देण्यात येते. यासाठी शिक्षण विभागाकडून राज्यस्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यंदा ९ हजार ४३२ शाळांमधील ९६ हजार ६८४ जागेवरील मोफत प्रवेशासाठी राज्यभरातून २ लाख २२ हजार ५८४ पालकांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. पहिल्या फेरीत नाव आलेल्या एकूण ६१ हजार १२३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. यामध्ये केवळ ७ हजार ५२९ विद्यार्थ्यांनीच प्रवेश पूर्ण केले. दोन्ही फेऱ्यानंतर अजूनही २८ हजार ३२ जागा रिक्त आहेत. पालकांमध्ये मोफत प्रवेशाबाबत दिवसेंदिवस उदासीनता वाढू लागली आहे.