महाराष्ट्र 24 – मुंबई –
राज्यातील दोनशे खेड्यांना भूस्खलनाचा धोका असल्याचा दावा भूगर्भ सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) प्रसिद्ध केलेल्या अहवालात केला आहे. ग्रेटर मुंबई महापालिकेने विनंती केल्यानंतर भूगर्भ विभागाने २२५ खेड्यांचा अभ्यास केला होता. संशोधकांनी यासाठी या सर्व खेड्यांचे धोक्याच्या चार श्रेणींमध्ये विभाजन केले आहे.
राज्यातील चार जिल्ह्यांतील ४७ गावांना भूस्खलनाचा सर्वाधिक धोका असल्याचे आढळले. हा अहवाल त्या त्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भूस्खलनाच्या या धोक्याचा अभ्यास करण्यासाठी ‘जीएसआय’कडून दोन शोध प्रकल्प हाती घेण्यात आले होते. या प्रकल्पांचा कालखंड हा २०१५ ते १८ असा होता. या प्रकल्पाच्या माध्यमातूनच रायगड, रत्नागिरी, पुणे आणि ठाणे जिल्ह्यांतील लोकवस्तीला लागून असलेल्या धोकादायक उतारांची माहिती संकलित करण्यात आली तसेच मुंबईच्या नागरी भागांतील लोकवस्तीला लागून असलेल्या टेकड्यांचे धोकादायक उतारही निश्चित करण्यात आले होते.
पश्चिम घाटातील १९८० पासूनच्या भूस्खलनाचा जीएसआयकडून सविस्तर अभ्यास केला जात असून याचे आपत्तीपूर्वी आणि आपत्तीनंतर असे दोन भागांत त्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय भूस्खलन शक्यता मापन कार्यक्रमान्वये तब्बल २८ हजार किलोमीटरच्या परिसराचा वेध घेणारा भूस्खलन संभाव्यतः नकाशा तयार केला जात असून, यामध्ये महाराष्ट्रातील डोंगराळ भागांचा समावेश आहे. हा नकाशा २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे.