महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑक्टोबर । टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) जिंकण्यासाठी टीम इंडिया सर्वात प्रबळ दावेदार आहे. 2013 नंतरच्या प्रत्येक आयसीसी स्पर्धांमध्ये सुरुवातीला चांगली कामगिरी केल्यानंतरही निर्णायक क्षणी स्पर्धा जिंकण्यात भारतीय क्रिकेट टीमला अपयश आलं आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीखाली होणारी ही शेवटची टी20 स्पर्धा आहे. त्यामुळे कॅप्टनला स्पर्धा जिंकून विजयी निरोप देण्याचा टीमचा प्रयत्न असेल. या सर्व पार्श्वभूमीवर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी भारतीय टीमला या स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा मंत्र दिला आहे.
‘तुम्ही सहज चॅम्पियन होत नाही. त्यासाठी एका प्रक्रियेतून जावं लागतं आणि त्यासाठी परिपक्वता दाखवणे आवश्यक आहे. टीम इंडियामध्ये गुणवत्ता आहे. त्यांच्याकडं या स्पर्धेत रन काढणारे आणि विकेट्स घेऊ शकतील असे खेळाडू आहेत. त्यासाठी त्यांनी मानसिक पातळीवर चांगली तयारी केली पाहिजे.
टीम इंडियानं थेट चॅम्पियन होण्याचं लक्ष ठेवण्यापेक्षा प्रत्येक मॅच जिंकण्यावर भर द्यावा. फायनल संपल्यानंतर कोणतीही टीम चॅम्पियन होते. त्यापूर्वी बरंच क्रिकेट खेळावं लागतं. भारतीय टीमनं प्रत्येक मॅचवर लक्ष देऊन पुढे जाण्याचा विचार करावा, सुरुवातीपासून चॅम्पियनशिपचा विचार करु नये,’ असा मंत्र गांगुलीनं यावेळी दिला.
भारतीय टीम प्रत्येक स्पर्धेत विजेतेपदाची दावेदार असते. त्यांनी निकालापेक्षा प्रोसेसवर भर द्यावा. कारण तुम्ही अतिरिक्त काळजी घेतली तर ते अवघड होते. तुम्हाला बॉलर्सच्या हातामधून सुटणारा बॉल चांगल्या पद्धतीनं खेळायचा आहे. टीम फायनलमध्ये पोहचेपर्यंत ही गोष्ट सातत्यानं करायची आहे,’ याची आठवणही गांगुलीनं करुन दिली.
आयपीएल 2021 मध्ये टी-20 क्रिकेटच्या हिशोबाने कमी स्कोअर झाला, पण याबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचं गांगुलीनं सांगितलं. दुबई आणि अबु धाबीमध्ये बॅटिंगसाठी चांगल्या खेळपट्ट्या असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गांगुलीने दिली. 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 24 ऑक्टोबरला होणार आहे. या मॅचपूर्वी टीम इंडिया इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रॅक्टीस मॅच खेळणार आहे. या मॅचमधील खेळाडूंच्या कामगिरीनंतरच विराट कोहलीला वर्ल्ड कप स्पर्धेतील प्लेईंग 11 निश्चित करणे सोपे जाईल.