महाराष्ट्र २४; मुंबई – निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींची फाशी पुन्हा एकदा टळली आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींना आपली यंत्रणा का पाठिशी घालते आहे असा संतप्त सवाल निर्भयाच्या आईने उपस्थित केला आहे. दिल्ली कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर निर्भयाच्या आईची संतप्त आणि उद्गिग्न प्रतिक्रिया समोर आली आहे.
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी पवन कुमारची याचिका कोर्टाने फेटाळली. तसेच त्याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनीही फेटाळला. असं असूनही पुढील निर्णयापर्यंत दिल्ली कोर्टाने या चारजणांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे निर्भयाची आई अस्वस्थ झाली. त्यांना कोर्टाच्या आवारातच रडू कोसळलं.
काय म्हटलं आहे निर्भयाच्या आईने?
“आपली यंत्रणा बलात्काऱ्यांना पाठिशी का घालते आहे? आत्तापर्यंत तीनवेळा डेथ वॉरंट बदलण्यात आलं. फाशीची शिक्षा देण्यासाठी तारखा देण्यात आल्या मात्र शिक्षेची अंमलबजावणी झाली नाही. हे आपल्या यंत्रणेचं अपयश आहे. कोर्टाकडून फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी इतका विलंब का लागतो आहे?”