महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ नोव्हेंबर । सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक (Good News for Common People) बातमी आहे. दिवाळी आणि छठपूजेपूर्वी खाद्यतेलाचे दर कमी (Edible oil price down) झाले आहेत. त्यामुळे गेल्या काही काळापासून महागाईमुळे त्रस्त असणाऱ्या सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या काळात (Festive Season Oil Price Down) ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अदानी विल्मर आणि रुची सोया इंडस्ट्रीजसह प्रमुख खाद्य तेल कंपन्यांनी घाऊक दरात 4-7 टक्क्यांनी (Edible oil price) कपात केली आहे. इंडस्ट्री बॉडी सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन (SEA) ने मंगळवारी अशी माहिती दिली की, इतर कंपन्यांही अशाचप्रकारे खाद्यतेलाच्या दरात कपात करू शकतात.
SEA ने अशी माहिती दिली की, जेमिनी एडिबल्स अँड फॅट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (हैदराबाद), मोदी नॅचरल्स (दिल्ली), गोकुळ रिफॉइल्स अँड सॉल्व्हेंट लिमिटेड (सिद्धपूर), विजय सॉल्व्हेक्स लिमिटेड (अलवर) गोकुळ अॅग्रो रिसोर्सेस लिमिटेड आणि एनके प्रोटीन्स प्रायव्हेट लिमिटेड (अहमदाबाद) या कंपन्यांनी देखील खाद्यतेलाच्या घाऊक दरात कपात केली आहे
सोयाबीन आणि भुईमूग पिकात वाढ
सणांच्या काळात ग्राहकांना चढ्या किमतींपासून दिलासा देण्यासाठी SEA ने आपल्या सदस्यांना असे आवाहन केल्यानंतर या कंपन्यांनी खाद्यतेलाच्या घाऊक किमती कमी केल्या आहेत. SEA चे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, उद्योगाकडून मिळालेला हा प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक आहे.
SEA ने सांगितले की त्यांनी आधीच घाऊक किमती 4,000-7,000 रुपये प्रति टन (4-7 रुपये प्रति लीटर) कमी केल्या आहेत आणि उर्वरित कंपन्या देखील खाद्यतेलाच्या किमती कमी करणार आहेत. चतुर्वेदी म्हणाले की, यावर्षी देशांतर्गत सोयाबीन आणि भुईमूग पीक तेजीत आहे, तर मोहरीच्या पेरणीचे प्रारंभिक अहवालही चांगले आहेत. त्यामुळे भरपूर पीक अपेक्षित आहे. देशांतर्गत खाद्यतेलाबरोबरच जागतिक खाद्यतेलाच्या पुरवठ्याची स्थिती सुधारत आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय खाद्यतेलाच्या किंमतीवर होत आहे. आंतरराष्ट्रीय किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. काहीच दिवसात लग्नसराईचा मौसम सुरू होईल, यावेळी खाद्यतेलाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीनुसार देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमतींची वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ – इंडोनेशिया, ब्राझील आणि इतर देशांमध्ये जैवइंधनासाठी तेलबियांचा वापर वाढल्यानंतर, केटरिंग वापरासाठी खाद्यतेल कमी उपलब्ध झाल्यामुळे या तेलांच्या किमती वाढल्या आहेत. भारत आपली खाद्यतेलाची 60 टक्क्यांहून अधिक गरज आयातीद्वारे भागवतो. जागतिक किमतीतील कोणत्याही वाढीचा थेट परिणाम स्थानिक किमतींवर होतो. किमतींवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात करण्यासह इतर अनेक उपाययोजना केल्या होत्या, ज्याने किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत केल्याचे SEA ने म्हटले आहे.