महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ नोव्हेंबर । टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) सेमी फायनल गाठण्याची टीम इंडियाची आशा आता जर-तरमध्ये अडकली आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजली जाणारी भारतीय क्रिकेट टीम (Team India) पहिल्या दोन मॅचमध्ये पराभूत झाली आहे. त्यामुळे अनेक फॅन्सच्या टीमवरील आशा संपल्या आहेत. पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. त्यात वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेत एखादी कमकुवत वाटणाऱ्या टीमनं बलाढ्य टीमचा पराभव केला आहे, असा इतिहास आहे.
टीम इंडियाच्या फॅन्सच्या आशा बुधवारी होणाऱ्या एका मॅचवर आहेत. भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यात बुधवारी मॅच होणार आहे, या मॅचमध्ये टीम इंडियानं मोठ्या फरकानं विजय मिळवावा, अशी अपेक्षा फॅन्सना आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड विरुद्ध स्कॉटलंड (New Zealand vs Scotland) या मॅचमध्ये स्कॉटलंडनं न्यूझीलंडला हरवावं अशी फॅन्स प्रार्थना करत आहेत. स्कॉटलंडनं न्यूझीलंडला हरवण्याचा चमत्कार केला तर टीम इंडियाचं सेमी फायनलच्या रेसमध्ये पुनरागमन होणार आहे.
टी20 वर्ल्ड कपमध्ये बुधवारी स्कॉटलंड विरुद्ध न्यूझीलंड आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान या दोन मॅच होणार आहेत.स्कॉटलंडनं मॅच जिंकली तर न्यूझीलंड देखील भारताप्रमाणेच दोन मॅच गमावेल. त्यानंतर अखेर भारत आणि न्यूझीलंडचे समान पॉईंट्स झाले तर नेट रनरेटच्या आधारावर सेमी फायनलमधील जागेचा निर्णय होईल. यावेळी टीम इंडियाला संधी मिळू शकते.
पॉईंट टेबलमधील टॉप-2 च्या रेसमध्ये अफगाणिस्तानची टीम इंडियाला मदत होऊ शकते. भारतीय टीमनं उर्वरित 3 मॅच जिंकल्या तर त्यांचे 6 पॉईंट्स होतील. तर अफगाणिस्ताननंही न्यूझीलंडला हरवलं तर अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि भारताचे प्रत्येकी 6 पॉईंट्स होतील. त्यावेळी देखील नेट रनरेट निर्णायक ठरेल. पण अफगाणिस्तानचा नेट रनरेट हा सध्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे या परिस्थितीत अफगाणिस्तानची टीम भारत आणि न्यूझीलंड यांना मागे टाकून सेमी फायनलमध्ये पोहचू शकते. त्यामुळे अफगाणिस्तानपेक्षा स्कॉटलंडनंच न्यूझीलंडला हरवण्याचा चमत्कार केला तर टीम इंडियाचा मार्ग सोपा होईल.