महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ नोव्हेबर । त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. राज्यातील अमरावतीत या पार्श्वभूमीवर जास्त हिंसक वातावरण झालेले दिसले. शुक्रवारपासून अमरावती शहरात तणाव आणि दशहतीचे वातावरण झाले होते. आज अमरावतीतील राजकमल चौकातही मोठ्या संख्येने जमाव एकवटला आणि दुकानांची तोडफोड केली. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलिस आणि पालकमंत्र्यांनी केलेले असूनही जमावाकडून हिंसक घटना घडत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अमरावतीत कलम 144 लागू केले आहे.
अमरावतीमध्ये शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 20 एफआयआर नोंदवले आहेत, तर 20 जणांना अटक करण्यात आली आहे. अमरावती वगळता संपूर्ण राज्यात शांतता असल्याचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. आम्ही स्थानिक लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कोणी चिथावणी दिल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.
दरम्यान, भाजपने आज संपूर्ण जिल्ह्यात बंदचे आवाहन केले असताना आज अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यात गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. जी दुकाने सुरू आहे त्याला बंद करा. अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. आंदोलक ‘जय श्री राम’ च्या घोषणा देत असून, त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या आहेत. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आंदोलकांना शांत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
शुक्रवारी मुस्लिम समाजाने बंद पुकारले होते, शुक्रवारी दुपारी नमाज अदा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन काढण्यात आले होते. त्याच दरम्यान चित्रा चौकातील काही दुकाने सुरू दिसली. आंदोलकांनी दुकानदारांना बंद करण्याची विनंती केल्यानंतरही दुकान बंद न केल्याने आक्रमक आंदोलनकर्त्यांनी दुकानांवर दगडफेक केली. या दगडफेकीत शहरातील सुमारे 20 ते 22 दुकांनाची तोडफोड करण्यात आली होती.