महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ नोव्हेबर । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मोठी घोषणा केली. 3 कृषी कायदे मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. पंतप्रधान मोदी यांनी हे कृषी कायदे मागे घेण्यासाठी संसदेच्या आगामी सत्रामध्ये कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाईल असे जाहीर केले. गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने त्यांनी ही घोषणा केली. हे कायदे रद्द व्हावेत यासाठी शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले होते, जे अद्यापही सुरू आहे.
केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी सुधारणा कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांनी थेट राजधानी दिल्लीत आंदोलन करीत केंद्र सरकारची कोंडी केली होती. या आंदोलनाला देशभरातून आणि जगातूनही प्रतिसाद मिळाला होता. 9ऑगस्ट 2020 पासून या आंदोलनाला सुरुवात झाली होती. हे आंदोलन 1 वर्षाहून अधिक काळ सुरू होतं.
पुढच्या वर्षी 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांचाही समावेश आहे. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन पुकारणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये या दोन राज्यातील शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. आंदोलन असेच सुरू राहिले तर त्याचा भाजपला निवडणुकीमध्ये फटका बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती.