महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ डिसेंबर । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सेंच्युरियनमध्ये पहिली टेस्ट होत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाकडं 146 रनची आघाडी होती. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या भारतीय टीमनं पहिल्या इनिंगमध्ये 327 रन काढले. त्याला उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेची पहिली इनिंग 197 रनवर आटोपली. या टेस्टमधील दुसऱ्या दिवशी पावसामुळे एकही बॉल खेळ झाला नाही.
सेंच्युरियन टेस्टवर पावसाचं संकट कायम आहे. दुसऱ्या दिवसाचा संपूर्ण खेळ पावसामुळे रद्द झाला. तिसऱ्या दिवशी पावसानं विश्रांती घेतल्यानं फॅन्सना चांगली मॅच पाहता आली. आता मॅचच्या चौथ्या दिवशी देखील ढगाळ हवामानाची (India vs South Africa Weather Forecast) शक्यता आहे.
अर्थात हे काळे ढग पाहून फॅन्सना काळजी करण्याची गरज नाही. कारण, बुधवारी पावसाची शक्यता जवळपास नाही. ढगाळ वातावरणासोबतच ऊन देखील पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. पण, या टेस्टचा पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे बिघडण्याची शक्यता आहे.
चौथ्या दिवशी तापमानामध्ये 28.2 डिग्री सेल्सियसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज 20 टक्के असून मॅच दरम्यान त्याचा अडथळा येणार नाही, असा अंदाज आहे. पण पाचव्या दिवशी मॅच दरम्यान पावसाचा अडथळा येऊ शकतो, असा अंदाज ‘वेदर डॉट कॉम’ नं व्यक्त केला आहे.
दरम्यान तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियाने 1 आऊट 16 रन केले आहेत. दिवसाअखेरीस केएल राहुल 4 रनवर तर नाईट वॉचमन म्हणून बॅटिंगला आलेला शार्दुल ठाकूर 4 रनवर खेळत आहे. मयंक अग्रवाल 4 रनवर आऊट झाला, त्याला मार्को जेनसनने माघारी पाठवलं.
भारताकडून पहिल्या इनिंगमध्ये मोहम्मद शमीने (Mohammad Shami) सर्वाधिक 5 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. मोहम्मद सिराजला एक विकेट घेण्यात यश आलं. दक्षिण आफ्रिकेकडून टेम्बा बऊमाने सर्वाधिक 52 रन केल्या, तर क्विंटन डिकॉक 34 रन करून आऊट झाला.