महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० डिसेंबर । उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन त्यांच्या विचित्र नियमांसाठी आणि क्रूर शिक्षेसाठी ओळखले जातात. तसेच त्यांच्या विक्षिप्त स्वभावामुळेही ते नेहमी चर्चेत असतात. आता त्यांचा लूक बदलल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. ते त्यांच्या पक्षाच्या एका कार्यक्रमात नुकतेच दिसले होते. त्यावेळी ते खूप सडपातळ दिसत असून त्यांच्या चेहऱ्यातही बदल दिसत आहे. सध्या त्याची चर्चा होत आहे.
किम जोंग उन यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियात 11 दिवस जनतेला हसण्यासाठी, रडण्यासाठी, खरेदी करण्यासाठी आणि मद्यपानासाठी मनाई केली होती. त्यांचे वडील किम जोंग इल यांचे दहावा स्मृतीदिन असल्याने त्यांनी हा विचित्र नियम जारी केला होता. वडिलांच्या मृत्यूला 10 वर्षे पूर्ण झाल्याने त्यांनी जनतेवर 11 दिवसांसाठी हे निर्बंध लादले होते. त्यावेळी याची खूप चर्चा झाली होती.
आता नुकतेच ते त्यांच्या पक्षाच्या एका कार्यक्रमात सर्वासमोर आले त्यावेळी त्यांच्या बदललेल्या लूकमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या कार्यकर्मात ते खूप सडपातळ दिसत आहेत. तसेच त्यांचा चेहराही खूप वेगळा दिसत आहे. त्यांचे वजन खूपच कमी झाल्याचे त्यांच्या लूकमध्ये बदल दिसत आहेत. उत्तर कोरियाच्या कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने हा फोटो 28 डिसेंबर 2021 रोजी जारी केले आहेत. त्यांनी सुमारे 40 पाऊंड वजन कमी केल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर कोरियात अन्नधान्याची कमतरता जाणवत असल्याने किम जोंग उन कमी जेवण घेत असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. देश सध्या बिकट परिस्थितीतून जात आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत प्रत्येकाने कमी जेवावे, तसेच अन्नधान्याची नासाडी करू नये, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. किम जोंग उन बराच काळ सर्वासमोर येत नसल्याने त्यांच्या प्रकृती अस्वास्थाच्या चर्चा सुरू असतात. आता त्यांच्या बदललेल्या लूकमुळे आणि ते सडपातळ झाल्याने पुन्हा एकदा त्यांच्या प्रकृतीबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
किम जोंग उन यांची प्रकृती उत्तम असून त्यांना कोणताही त्रास नसल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. देशातील अन्नधान्याची समस्या आणि पक्षाचे धोरण याबाबत चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 2025 पर्यंत चीनशी असलेली सीमा सुरू होत नाही, तोपर्यंत उत्तर कोरियाला अन्नधान्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागेल. त्यामुळे अन्नधान्य काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.