महाराष्ट्र २४- मुंबई, : जगभरातील अनेक देशांसाठी डोकेदुखी ठरत असलेला कोरोना व्हायरस महाराष्ट्रात थैमान घालू नये, यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. अनेक शहरांमध्ये विविध व्यवसाय बंद ठेवण्यापासून ते कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचाराबाबत सरकारकडून वेगाने हालचाली करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आणखी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.
‘राज्यभरात आतापर्यंत 42 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. सर्वांची परिस्थिति स्थिर आहे. गर्दी टाळण्यासाठी एपिडेमिक कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र खासगी लॅबना अजून कोरोना चाचणी करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. नायडू रूग्णालयात 100 तर वाय.सी.एम. रूग्णालयात 60 बेड्स सुरू करण्यात आले आहेत. तर वर्क फ्रॉम होमची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे,’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
आरोग्यमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या?
1. कोरोनाव्हायरच्या चाचणीसाठी महाराष्ट्रात येत्या आठवड्याभरात सुरू होणार 8 नव्या लॅब. उद्यापासूनच 4 नव्या लॅब सुरू होणार हाफकिन्समध्येही होणार कोरोनाव्हायरसची चाचणी
2. राज्यातली क्वारन्टाइनसाठीचे बेड वाढवले.
3. आयसोलेशन वॉर्ड वाढवले.
4. पुण्यातील 8 खासगी रुग्णालयांना विलगीकरण्यासाठी परवानगी
5. लवकरच केंद्राकडून कोरोनाव्हायरससंदर्भातल्या 10,000 किट मिळणार
दरम्यान, राज्यात आज आणखी एका करोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 42 झाली आहे. त्यातील एका व्यक्तीचा काल मुंबईत मृत्यू झाला आहे. कोरोनाबधित 32 वर्षीय महिला नेदरलँड वरुन दुबई मार्गे पुण्यात आलेली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.