महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ जानेवारी । देशात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील मुख्यमंत्र्यांशी गुरुवारी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. प्रकृतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला स्वत: न जाता आरोग्यमंत्री राजेश टोपे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाठवले होते. मात्र, बैठकीमध्ये टोपे आणि वळसे यांना बोलण्याची संधीच न मिळाल्याने राज्याच्या मागण्या लेखी देण्याची वेळ महाराष्ट्रवर ओढवली.
पंतप्रधानांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीमध्ये विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यातील कोरोनाच्या स्थितीविषयी भूमिका मांडली. तसेच कोरोनासंदर्भातल्या आपल्या मागण्यादेखील त्यांनी पंतप्रधानांसमोर ठेवल्या. या वेळी महाराष्ट्राच्या मागण्या मात्र राजेश टोपे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पंतप्रधानांसमोर प्रत्यक्ष बोलून ठेवता आल्या नाहीत. बैठकीमध्ये फक्त मुख्यमंत्र्यांनाच बोलू द्यावे, असे पंतप्रधानांनी ठरवल्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष बोलून मागण्या मांडता आल्या नाहीत. आम्हाला तशी परवानगी द्यावी, अशी विनंतीदेखील केली. मात्र, ते शक्य होऊ न शकल्यामुळे आम्ही लेखी स्वरूपात मागण्या मांडल्या, असे टोपे यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले.