महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ जानेवारी । कोरोनाच्या वाढणाऱ्या केसेस पाहून राज्यातल्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी रुग्ण नाहीत तिथे पन्नास टक्क्यांच्या क्षमतेने शाळा पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. त्यामुळे पंधरा दिवसांनंतर आढावा घेऊन यावर पुनर्विचार करण्यात येईल व त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर निर्णय घेतील, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिल़ी राजेश टोपे म्हणाले, लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी असल्याने अनेक शिक्षणतज्ञांनी शाळा सुरू करण्यास हरकत नसल्याचे मत नोंदवले आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीतही चर्चा झाली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी आहे, तिथे अपडेट घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास आज वर्ष झाले आहे. लसीकरण ऐच्छिक आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर आयसीयू आणि व्हेंटिलेटरची गरज पडत नाही. त्यामुळे प्रत्येकाने लस घेतली पाहिजे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.