महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० जानेवारी । सर्वत्र कोरोना तसेच ‘ओमायक्रॉन’ची साथ असताना रक्तदानाचा वेग कमालीचा घसरल्यामुळे राज्यात आजघडीला केवळ दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक राहिला असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये मिळून केवळ ४१ हजार रक्ताच्या पिशव्यांचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय रक्तसंक्रमण परिषदेच्या निधीवरही ७० टक्क्यांपेक्षा जास्त काट मारण्यात आली आहे. परिषदेसाठी २२ कोटींची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र फक्त २ कोटी २० लाख रुपये मिळाले आहेत.
राज्यात सध्या एकूण ३५० रक्तपेढ्या असून त्यापैकी ७६ सरकारी आहेत. उर्वरित २७४ रक्तपेढ्यांमध्ये १३ ‘इंडियन रेडक्रॉस’च्या, १२ खासगी आणि उर्वरित वेगवेगळे ट्रस्ट व स्वयंसेवी संस्थांच्या आहेत. २०२० मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तसंकलनासाठी केलेल्या आवाहनामुळे १५.४६ लाख युनिट रक्तसंकलन झाले होते. २०२१ मध्ये सुमारे १६ लाख युनिट रक्तपिशव्या संकलन झाले होते, अशी माहिती राज्य रक्तसंक्रमण परिषदेचे (एसबीटीसी) सहसंचालक डॉ. अरुण थोरात यांनी दिली.