महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ जानेवारी । वेण्णालेक, ऑर्थरसीट व टेबललॅण्ड वगळता महाबळेश्वर आणि पाचगणी येथील उरलेली सर्व प्रेक्षणीय स्थळे काही अटी आणि शर्तींवर सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली. बैठकीला महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार, महाबळेश्वरचे अब्दुल बिद्री, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, हॉटेल संघटनेचे अध्यक्ष असिफ सय्यद, दिलीप जव्हेरी, टॅक्सी संघटनेचे अंकुश बावळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्बंधामुळे महाबळेश्वर आणि पाचगणी येथे पर्यटकांची गर्दी होणारी प्रेक्षणीय स्थळे बंद करण्यात आली होती. याचा परिणाम व्यवसायावर होत असल्याने व्यावसायिक व नागरिकांच्या शिष्टमंडळाने आमदार मकरंद पाटील यांच्याकडे प्रेक्षणीय स्थळे सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आमदार पाटील व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी चर्चा केली. तसेच मुंबई येथे मंत्रालयात राज्याचे अतिरिक्त सचिव असिम गुप्ता यांची भेट घेत चर्चा केली. त्यावर गुप्ता यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या आदेशानुसार या दोन्ही पर्यटनस्थळांवरील गर्दीचा आढावा घेतला. या संदर्भात त्यांनी महसूल, नगरपालिका, वन विभाग व पंचायत समितीच्या विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करत आपला अहवाल सचिव गुप्ता यांना पाठविला. त्यानुसार त्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांची बैठक गेऊन काही अटी व शर्तीवर मोठी गर्दी होणारी प्रेक्षणीय स्थळे वगळता उर्वरित सर्व प्रेक्षणीय स्थळे सुरू करण्याचे आदेश दिले.
प्रत्येक प्रेक्षणीय स्थळावर पर्यटकांची फक्त 25 वाहने जातील. या वाहनांमधील परत आलेल्या वाहनानंतर प्रवेश हद्दीत थांबलेल्या पर्यटकांच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल. सर्व ठिकाणी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबरच येथील स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांवर राहील, असेही प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी बैठकीत स्पष्ट केले.