शेतकऱ्याची सरकारकडे गांजाची शेती करण्याची परवानगी देण्याची मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३१ जानेवारी । सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. भाजपकडून मोठ्या प्रमाणात या निर्णयाला विरोध होत आहे. यातच आता नांदेडच्या शेतकऱ्याने राज्य सरकारवर टीका करत गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गांजाच्या शेतीला परवानगी मिळण्यासंदर्भात नांदेडचे शेतकरी अविनाश अनेराये यांनी ईमेल केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळत चालले आहे. त्यात कोरोना आणि काही विभागात कडाक्याची थंडी आणि गारांचा पाऊस यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरी आपण सरसकट शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी सशर्त परवानगी देऊन त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सहकार्य करावे, असे या ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.

जर किराणा दुकानात वाईन विक्रीला सरकार परवानगी देत असेल, तर शेतकऱ्यांना गांजाची शेती करायला देखील परवानगी द्यावी, अशी मागणी नांदेड भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे. दारू विक्रीतून सरकारला उत्पन्न वाढवायचे असेल, तर गांजाच्या शेतीतूनही चांगले उत्पन्न होईल, असे म्हणत नवाब मलिकांच्या जावयाने हर्बल तंबाखूच्या नावाखाली गांजा उत्पादन केलेच आहे, त्यामुळे गांजाची शेती करण्याची परवानगी शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी चिखलीकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत राज्यातील द्राक्ष बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना देण्यासाठी आता सुपर मार्के्ट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. शैक्षणिक आणि धार्मिक स्थळांच्या जवळ मात्र वाइन विक्रीला परवानगी मिळणार नाही. या निर्णयाला भाजपने विरोध केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *